बुधवार, २८ मार्च, २०१८

राम ते 'श्री'राम...एक प्रवास

मानवत्वापासून ते देवत्वापर्यंतचा विस्मयकारी प्रवास म्हणजे रामायण. 'राम' ते 'श्रीराम' होण्याचा प्रवास. 'नर' ते 'नारायण' होण्याचा प्रवास. मानवी जीवनाला असणाऱ्या मर्यादेच्या सर्व चौकटी सांभाळत जीवनाला सर्वोच्च पातळीवर नेत अद्भुत आदर्शाचा परिपाठ श्रीरामांनी आपल्यासाठी घालून दिला आहे.

'गदिमा' या देवदूताचे अनंत असे उपकार आपल्यावर. रामायणातील अनेकाविध पैलू गीत रुपात त्यांनी असे काही मांडलेत की आपल्याला 'धन्य मी मानव गदिमा, ऐकिले गीतरुपी रामायणा' असं म्हणावसं वाटतं. उपमा, कल्पनाविलास, शब्दांची निवड आणि यमक इतकं चपखल की स्वतः ज्ञानदेवांनी 'वा' म्हणावं. आणि इतक्या दिव्य शब्दांना स्वर्गीय साज चढवून स्वरबद्ध करणारे बाबूजी म्हणजे जणू पंढरीचा कळस. वारीला जाणाऱ्या सर्वांनाच पंढरीनाथ भेटतोच, दिसतोच असं नाही पण कळस दिसला तरी समाधान वाटते. तसंच गदिमांचे शब्द, त्यांचे गर्भीतार्थ मतीतार्थात उतरले नाहीत तरी बाबूजींचे अमृतरुपी संगीत मनाला सुखाने चिंब करून जाते.

श्रीराम देव होते, त्यांना सर्व सहजशक्य होते असे वाटणाऱ्यांसाठी श्रीराम मानवी आयुष्यचं कसे जगले यावर उजळ प्रकाश टाकणाऱ्या ओळीं गदिमांच्या लेखणीतून अवतरल्या आहेत.

आश्रमाजवळ एक सुंदर असा अभूतपूर्व सुवर्णमृग पाहून 'तोडीता फुलें मी सहज पाहिला जातां, मज आणुनि द्या तो हरिण अयोध्यानाथा' असा लडिवाळ हट्ट मैथिलीने धरला तेव्हा तिच्यातील स्त्रीसुलभ वर्तन दिसून येते. जन्मजात असलेले सौंदर्य वाढवण्यासाठी इतर प्रसाधनाचा वापर करणे, राजवैभवाचा त्याग करून अरण्यात येताना काहीच न वाटणे पण एकाच सुवर्णमृगावर भाळून त्याचा मोह उत्पन्न होणे हे स्वभावातील गुणदोष अतिशय सजीवपणे गदिमा समोर आणतात. आपल्या पत्नीच्या इच्छेसाठी श्रीराम त्या सुवर्णमृगामागे जातात आणि परत आल्यावर सीता आश्रमात नाही हे पाहून अत्यंत व्यथित होतात. वृक्षवेली, पानाफुलांना सीता कुठे आहे हे विचारू लागतात आणि शेवटी 'काय भोगणें आता उरलें, चार दिसांचें चरित्र सरलें, हे दुःखाचें सागर भरलें, यांत जाऊं दे राम वाहुनी' असं म्हणून दुःखविलाप करू लागतात. आपली प्रिय व्यक्ती दिसेनाशी झाल्यावर निघणारी ही शोकाकुल प्रतिक्रिया अगदी सहज आहे.

दुसऱ्या एका प्रसंगी रावणासोबत निर्णायक युद्ध करताना श्रीराम रावणाचे शीर्ष उडवून लावतात. रावणाचे एक शीर्ष तोडल्यावर लगेच तिथे दुसरे शीर्ष उपजते. असे शंभरवेळा घडते तेव्हा हा चमत्कारिक प्रकार पाहून श्रीराम गोंधळतात आणि अत्यंत चिंतीत स्वरात सारथी मातलीला विचारतात,

आज कां निष्फळ होती बाण?
पुण्य सरें की सरलें माझ्या बाहूंमधले त्राण?

घडलेला प्रकार हा बुद्धीला चक्रावणारा होता, निराश करणारा होता, हताश करणारा होता. रामांच्या समोर रामरिपूंचे प्राण वाचणे मुळीच शक्य नसताना रक्ताने न्हालेला रावण जिवंत कसा? रावणांग तोडले असता दुसरे शीर्ष असे उपजते जसे का ही कुणा सजीव शिरांची खाणच आहे. ज्या शरांनी खर, दूषण, मारिच, वाली क्षणांत गतप्राण झाले, ज्या शरांच्या भीतीपोटी स्वतः सागर मागे हटला त्या पराक्रमी माझ्या अक्षय्य भात्यात आज विजय देणाऱ्या शरांची वाण पडावी, काय हे दुर्दैव? असे नानाविध विचार श्रीरामांच्या मनात आले. रावणाला जिवंत पाहून त्यांना आपल्या धनुर्विद्येचा अपमान असह्य झाला. इतकेच नव्हे तर आपले लंकेस येणे व्यर्थ तर झालें नाही ना असा विचारदेखील त्यांच्या मनात चमकून गेला. वैचारिक द्वंद्वाने मनात थैमान घातले.

हा मनुष्य स्वभाव नव्हे तर दुसरे काय आहे? राग, लोभ, भय, मोह, द्वेष, मत्सर इत्यादी सर्व गुणांनी युक्त जगात मानवाप्रमाणे आयुष्य व्यतीत करून 'पुरुषोत्तम' बनणारे श्रीराम 'एकमेवोद्वितीय' आहेत. मानवाचे आयुष्य जगून, सुखदुःखे भोगत स्वयंशासित लोकराज्य आणणारे आदर्श नृप श्रीराम आहेत. त्यांच्या नावापुढे लागणारा 'श्री' बराच गूढ आहे. तो ठळक उठून दिसतो पण त्यामागचे अखंड तप मात्र अजूनही झाकोळले जातेय. मानवतेकडून देवत्वाकडचा तो प्रवास आहे. 'असे जगलास तर तू देखील देव होऊ शकशील' हा विश्वास देणारा हा प्रवास आहे. वाल्मीकीरुपी ज्योतीने गायलेली रामरूपी तेजाची आरती आहे. अतिशय प्रेरणादायी, हृदयव्यापक आणि आयुष्याच्या कोणत्याही परिस्थितीत आधार देणारे रघुकुलटिळक श्रीरामचंद्र आपल्यावर असेच कृपाशीर्वाद धरून असों हीच प्रार्थना.

शेवटी मारुतीरायाप्रमाणे एकच मागणे मागवेसे वाटते,
"प्रभो, मज एकच वर द्यावा,
या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा"

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन...

ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील.

त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात.

तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो.

किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्‍यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही.
हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं.

महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो...

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०१५

वालीवध ना खलनिर्दालन...जादू गदिमांची!

गीतरामायण हे एक जबरदस्त शब्द गारूड आहे आणि त्यात गुंतताना आयुष्याचे सोने होतं जाते. असे असूनही मी अजून संपूर्ण गीतरामायण ऐकलेले नाहीये. :(

काही निवडक गाणीच मी वारंवार ऐकत आलोय, त्यातच सुख मानत आलोय. पण काल एक मस्त चमत्कार घडला. 'वालीवध ना खलनिर्दालन' हे गाणे ऐकण्यात आले. गदिमांनी प्रभू श्रीरामांनी वालीला मारल्यानंतर त्याच्याशी केलेला संवाद शब्दसाजात गुंफला आहे.

त्यातील सुरुवातीचे कडवे :

"अखिल धरा ही भरतशासिता
न्यायनीति तो भरत जाणता
त्या भरताचा मी तर भ्राता
जैसा राजा तसे प्रजाजन"

मी तुमचा काही अपराध केला नसताना आडून, लपून तुम्ही मला मारलेत या गोष्टीत काय पुरुषार्थ आहे? असा प्रश्न जेव्हा वालीने प्रभू श्रीरामांना केला तेव्हा त्यावर दिलेले सुरेख उत्तर म्हणजे वरील कडवे.

वालीचा वध श्रीरामांनी केला ही गोष्ट न्याय्यच होती. पण त्याचे श्रेय श्रीराम कनिष्ठ बंधू भरतास देतात.

श्रीराम म्हणतात की हे अखिल साम्राज्य भरत अतिशय न्यायी आणि नीतिला धरून योग्य पद्धतीने चालवतो आहे. (थोडक्यात भरत एक योग्य आणि आदर्श राजा आहे.) आणि मी तर भरताचा सख्खा भाऊ तसेच त्याच्या नगरातील एक नागरिक असल्याने राजाच्या अंगातील सद्गुण प्रजेत आणि पर्यायाने माझ्यात देखील उतरले आहेत. त्यायोगे मी न्यायाची बाजू घेऊन तुला (वालीला) मारले आहे.

श्रीराम हे त्यांनी केलेल्या न्यायाचे श्रेय भरतास देतात. अभूतपूर्व बंधुप्रेम आणि त्रेता युगातील राजाच्या प्रती असणाऱ्या निष्ठेचे हे उदाहरण आहे.

'जैसा राजा तसे प्रजाजन' या एका ओळीत गदिमांची जादू आहे. तिथे reading between the lines करावे लागते आणि मतितार्थ मतीत उतरवावा लागतो.

अर्थात मला जे जाणवले हे मांडण्यासाठी हा सगळा घाट घातला. इथे प्रतिक्रया द्या, तुमचे मत वाचायला आवडेल.

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

पितात सारे गोड हिवाळा...

​​आजकाल नुसतं 'थंडी' म्हटलं तरी कुडकुडायला होतंय. खरचं, अहो चक्क मुंबईत थंडी पडलीय. त्यामुळे माझ्यातलं आणि अंथरुणात नातं सकाळी जरा जास्तच घट्ट व्हायला लागलंय. अचानक ही गुरुत्त्वाकर्षणीय शक्ती अभूतपूर्वरित्या कार्य करू लागते आणि मग अंथरुणात आरामात झोपण्यापेक्षा नुसतं लोळत पडणं हे जास्त सुखदायक असतं हे परत पटतं. म्हणून कुंभकर्णाने कदाचित असे वरदान मागितले असावे. :)

पूर्वी थंडी ही केवळ मुंबईतही ३ ऋतू असतात म्हणून किंवा मर्ढेकरांच्या 'पितात सारे गोड हिवाळा' ह्या कवितेतच होती. रात्री तर देवाने त्याचा A.C. १६ वर ठेवला असावा असा भास होण्याइतपत थंडी वाजते. ठीकयं पण, चालायचंच. दिस जातील दिस येतील. तोपर्यंत कविवर्य मर्ढेकरांच्या खालील कवितेचा आस्वाद घेत हिवाळा पिऊया तर…

पितात सारे गोड हिवाळा ( कवी - बा. सी. मर्ढेकर )

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

बुधवार, २४ जुलै, २०१३

वन फॉर द अँड्रॉइड!

अँड्रॉइड मोबाइल घेण्याचे मुख्य कारण म्हणजे छंदांची होणारी पूर्तता. थोडक्यात काय, खेळायला मिळणारे अप्रतिम गेम्स, बहुपयोगी अॅप्सची आणि तेही फुकट. आता ह्या कारणांमध्ये आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे 'पुस्तके'.

पुस्तके वाचणे हा माझा आवडता छंद. गुगल प्लेवर वाचण्यासारखी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. साहित्य चिंतन हे अशी पुस्तके पुरवण्यात आघाडीवर आहेत. गुगल प्लेवर 'साहित्य चिंतन' असा सर्च केल्यास ही पुस्तके डाउनलोड करता येतील.

त्यातल्यात्यात सानेगुरुजींची पुस्तके निव्वळ अप्रतिम, सुरेख. संस्कार कशाशी खातात हे माहिती नसणाऱ्या पालकांना आणि अँड्रॉइडवर केवळ गेम्स खेळणाऱ्या आणि Whatsapp करणाऱ्या पाल्यांना काही चांगले गुण गोष्टींच्या आधारे सानेगुरुजी सहज शिकवतात. सानेगुरुजींची काही पुस्तके मी वाचली, अर्थात मोबाइलवर. अत्यंत सकारात्मक, गोड, सहज, साधी, सोपी वाक्यरचना आणि अंगात भिनतील असे संस्कार हे प्रत्येक गोष्टीचं वैशिष्टय.

मी वाचलेल्या सानेगुरुजींच्या काही पुस्तकांची नावे लिंक सकट देत आहे. त्याने डाउनलोड करायला मदत होईल.
या शिवाय २ भयकथा आहेत ज्या वाचताना खरोखर घाबरायला होतं.


मेंदीच्या पानावर ही अनिकेत समुद्र यांनी लिहिलेली लव्ह स्टोरी देखील वाचण्यासारखी आहे.

तर चला मग उचला मोबाइल आणि सुरु करा डाउनलोडिंग…

गुरुवार, ४ जुलै, २०१३

पहिला ब्लॉग, पहिली पोस्ट...

बरेच दिवस झाले होते ब्लॉग बनवून. वाट पाहत होतो कधी वेळ मिळेल आणि काय पोस्ट करायचे तेही सुचत नव्हते. बाकी पुणेरी म्हणजे पुण्याचे लोकं (हा टोमणा नाही तरी क्षमस्व!) मस्तच ब्लॉग लिहितात. अगदी आवर्जून वाचण्याजोगे.

अजून ही काही नक्की नाही तरी काही प्रसिद्ध आणि मला आवडलेल्या कविता पोस्ट करणार आहे. (अशा वेळी कॉपी + पेस्ट हे सगळ्यात मोठे वरदान वाटते.)

तरी पुढील वेळी लंप्या विषयी लिहिण्याचा मानस आहे. ऑनलाईन वाचा-वाची करताना मनालीच्या आणि रश्मीच्या ब्लॉग वर लंप्याची ओळख झाली. वनवास विषयी कळालं. थोडा शोध घेतला तर लक्षात आलं की ही तर पुस्तकांची सीरिज आहे.

                                              'वनवास', 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत'


मग काय Flipkart ला सांगितलं, पुस्तकं घरी आली. आईसाहेबांच्या भुवया वर झाल्या. आधी घेतलेली पुस्तकं तर वाच आणि मग नवीन घे वगैरे सल्ले दिले गेले, पण काय करु जुनी सवय (खोड) आहे संग्रह करण्याची. तर असो.

लंप्याचा 'बेष्ट' असा 'मॅड'नेस, त्याचे 'मॅड' मित्र आणि खऱ्या त्या २ गोष्टी ज्यांसाठी ही पुस्तके घेतली ती म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील लळा लावणारी कानडी वळणाची गोड मराठी आणि मलपृष्ठावरील पुलं चे मनोगत! हे सगळं म्हणजे अगदी परब्रम्ह प्राप्त झाल्यासारखं वाटतं आहे.


“लंप्याच्या भाषेत सांगायच म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ‘ मॅड सारख्या वाचल्या’ तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे…..”- इति पुल.